“अक्षर” ओळख” -
प्रवीण ड्युक विद्यापीठात Masters in International
Development Policy करत होते. मलाही त्यांच्या स्कूल मधे जायला परवानगी
होती. एक दिवस तेथील कॉम्प्युटरवर मी आपले मराठी वृत्तपत्र वाचत असतांना आलाबामाची एक मैत्रिण माझ्या मागे येऊन उभी राहिली.
“तू हे काय वाचतीएस? ही कुठली
भाषा आहे?”
“ही आमची भाषा आहे. मराठी!”– मी
“ही तुमची भाषा आहे? तुम्ही
रेघेच्या खाली लिहीता?” ती त्या कॉम्प्युटरकडे बारकाईनी पहात होती.
“हो!” - मी
“ही अक्षरं किती सुंदर आणि कमनीय आहेत. एखाद्या चित्रकारानी काढल्यासारखी वाटताएत.” - ती
``बाऽऽबे!! सदान्कदा कसली गं गात राहते!----- आणि त्या
गाण्यासोबतचा नाचरेपणाही सोड तुझा.’’ नेहमी अशी घरची मुक्ताफळं
ऐकणारी मुलगी टिव्हीवरच्या सारेगम च्या चुरशीत पहिली आली तर तिच्या घरच्यांना जसं वाटेल
तसं माझं उर अभिमानानी भरून आलं.
तिच्या कौतुकाने माझीही पहायची दृष्टी बदलून गेली. आपल्याच
भाषेतील अक्षरांच्या कमनीयतेकडे आपण कसं बरं इतक्या वर्षात पाहिलं नाही? अक्षरांकडे पाहता पाहता मला दुसरीचा वर्ग स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसू लागला.
ज्यांचं अक्षर चांगलं असेल त्या मुलींना शाळा भरायच्या आधी किंवा सुटल्यावर
अर्धा तास काटदरे बाई सुलेखन शिकवायच्या. शाळा भरायच्या आधी बाई
जेंव्हा फळा लिहीत असत तेंव्हा, त्यांच्या एका एका अक्षराच्या
जादूकडे बघत मागे 10- 20 तरी मुली उभ्या असत. साधन म्हणून वापरलेल्या शरीरालाही एखाद्या निर्लेप योग्याने तुच्छतेनी टाकून
द्यावे त्याप्रमाणे लिहिता लिहीता खडू संपत आला की बाईंची खडू टाकून द्यायची ढब मला
आजही आठवते.
अक्षरांचे कित्ते पुण्याच्या सुप्रसिद्ध
ABC म्हणजे आप्पा बळवंत चौक ते बुधवार
चौक जोडणार्या रस्त्यावरील बालाजी मंदिरासमोरील सामक ब्रदर्स कडून आणायचे.
त्यांच्याकडेच राणी निब मिळायचं. बाकीची निब्स
पिवळी बसकी छोटी असत. राणी निब मात्र चंदेरी लांब असायचं.
पिवळं निब पाच पैशाला असलं तर राणी निब 10 किंवा
15 पैशाला येई. ते टाकावर खोचून शाईच्या दौतीत
बुडवून एक एक अक्षर डौलदार काढावं लागे.
एअरमेल किंवा काळेज पेन, चेलपार्कची रॉयल
ब्ल्यू किंवा जेट ब्लॅक शाईची दौत आणि पेनात शाई भरायचा ड्रॉपर मिळाल्याचं पाचवीत काय अप्रूप असे. पण त्या अधी चार वर्ष सुलेखनाचे कित्ते पहिल्यांदा पेन्सिलीने आणि नंतर बोरूने
लिहावे लागत. तिरका छेद दिलेल्या बोरूच्या टोकाने लिहितांना -
ल चे दोन्ही गाल सारखेच गोबरे असले तरी नदीत एक पाय सोडून
बसलेल्या तरुणी प्रमाणे उजवा पाय खाली सोडून बसलेला आकर्षक ``ल‘’
हातात लामणदिवा घेऊन उभा असलेला “ज”
रथात डावा पाय खंबीर रोवून छाती पुढे काढून उभ्या राहिलेल्या
पार्थाप्रमाणे
असलेला “र”
गणपतीच्या
सोंडेप्रमाणे सरळ खाली येऊन गोलाकार वळलेला “ग”
कमळ पाकळी सारखा “क”
क्षत्रियाने धनुष्याला दोरी ताणून बसवत बाण लावल्याप्रमाणे
“क्ष”
अगदी
नळाच्या तोटी प्रमाणे “न”
बाळकृष्णाच्या कपाळावर रेखलेल्या गंधाप्रमाणे “ण”
एका पायावर टॅप डान्स करणारा “ह”
वेलीला लोंबणार्या गोलमटोल टरबुज बाळाप्रमाणे “ट” आणि “ठ” हृदयाचा
ठाव घेऊन गेली पाहिजेत.
प्रत्येक अक्षराचा खाली टेकलेला पाय रशियन बॅले करणार्या नर्तिकेनी तिच्या
पायाच्या बोटांवर उभं रहावं तसा अक्षराला सावरून धरत मोठ्या नजाकतीने उभा असला पाहिजे.
गुढीच्या काठीसारखा नाही. सगळं वाक्य कसं गजगामिनी सारखं तोर्यात झुलत पुढे
गेल्यासारखं वाटायला पाहिजे. हत्ती चालतांना फक्त त्याच्या बोटांवर
चालत असतो. म्हणून त्याची गजगामिनी चाल वहाव्वा म्हणायला लावते.
तसच अक्षरांचंही. लिहितांना शब्द कसे बॅले करत
कागदाच्या रंगमंचावर उतरायला पाहिजेत. लिहिणं ही कार्यपद्धती
असायची. टक टक टक टक बोटं कीपॅडवर दाबतांना पूर्वी अक्षरं जिवंत
व्हायची हे आपण विसरूनच गेल्यासारखं वाटलं
शब्दांवर दिली जाणारी रेघ शब्दाच्या
थोडी आधी सुरू होऊन शब्द संपेपर्यंत न तुटता
सलग ओढली गेली पाहिजे. शब्दामधे ताठ शिस्तीच्या सैनिकाप्रमाणे
“भ” उभा असेल तर वरून येणारी रेष त्याच्या अभिमानानी उंचावलेल्या मस्तकाला जराही
बाध न आणता किंचित थांबून पुढे गेली पाहिजे “ध” ची धनुकली मोडता
कामा नये. थ च्या थव्याला उडायला आडकाठी नको. छ ची छकुली अबाधित रहायला हवी.
लहान बाळाच्या जावळावरून फुंकर मारल्यारखी वरची रेघ अक्षरांना न दुखावता शब्दांना सुखावत
गेली पाहिजे. रेष काढतांना
सुरवातीचा कोन 30 अंशाच्या चढावर चढल्याप्रमाणे तर शेवट रँपवरून
उतरल्यासारख्या नजाकतीचा यायला पाहिजे. पाहणार्याची नजर हलकेच
रेघेवर चढत गेली पाहिजे आणि शब्दासोबत हलकेच उतरून पुढच्या शब्दावर गेली पाहिजे.
अक्षरांची डोकी छेदत जाणारी रेषा मनालाही जखमी करत जाते.
बोरुनी लिहितांना अक्षराच्या
वळणाप्रमाणे कुठे बारीक कुठे जाड दिसलं पाहिजे हे काटदरे बाईंनी इतकं घोटून घेतलं होतं.
की आजही चित्रातल्या नर्तकींप्रमाणे कमनीय देहाची ती अक्षरं माझ्या डोळ्यासमोर
उभी राहिली.
अरुंधती लिहीतांना “अ” चा खालचा गोल लामणदिव्याच्या “ज” सारखा थोडा वरपर्यंत आणायला मला आवडायचा मग रथात उभ्या असलेल्या मर्दानी योद्ध्यासारखा
“र” रेखल्यानंतर “ध” ची धनुकली रेखता रेखता कधी मी अक्षरांच्या
प्रेमात पडले हे मलाच कळलं नाही.
कधी “ब” नी माझ्या कमरेभोवती हात घातला आणि अगं म्हणतं कधी “ग” च्या खांद्यावर मी अलगद हात ठेऊन “ह” सारखा tap
dance च्या स्टेप्स घेत तर कधी “क” ला दिलेल्या कान्या प्रमाणे
Toe वर उभी राहून मनानी बॅले करायला लागले हे मलाच कळलं नाही.
अक्षरांमधे
प्राण ओतून त्यांना सजीव करणार्या काटदरे बाई आज नाहीत पण त्यांनी घोटून घेतलेल्या
अक्षरामुळे आज सुवाच्य अक्षराची आमची शाळेची टिमच्या टिम आपली कमनीय अक्षरं कागदावर
दिमाखात उतरवत आहे. मराठीचं, अक्षरांचं
ऐश्वर्य आपल्यासोबत मिरवत आहे.
आज संस्कृतच्या 85 स्तोत्रांना संस्कृत आणि मराठी नियम
काटेकोर सांभाळत; आणि तरीही लालित्यात कसूर न होऊ देता; मायबोलीच्या रथात घालून दिमाखात मराठी साहित्यराज्यात जिंकलेल्या राजकन्यांप्रमाणे
घेऊन येतांना झालेला आनंद; मी आज मातृभाषा दिनी, आम्ही बोलतो मराठी! लिहीतो मराठी असा अभिमानानी व्यक्त
करीन.
-----------------------------
लेखणी अरुंधतीची -
No comments:
Post a Comment